Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 22th June 2022
राज्यसभा निवडणुकीच्या अपयशातून सावरतोय तेवढ्यात ‘’आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करावी आणि राज्यात नवे सरकार स्थापन करावे’’ असा प्रस्ताव शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर ठेवून काल २२जून रोजी 40 आमदारांसह सूरतेची वाट धरत बंड पुकारले.
समर्थक आमदारांसह शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पूर्णपणे चक्रव्यूहात अडकली असून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. उध्दव ठाकरे यांच्या हातात पक्षाची धुरा असताना शिवसेनेतील हे पहिले बंड आहे. म्हणून गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेची हकालपट्टी करताना दुसऱ्याबाजूने मात्र शिवसेनेतून त्यांची मनधरणी होत आहे.
मला कोणत्याही मंत्रीपदाची आशा नाही. मात्र हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असे ठाकरे यांच्याशी संवादात सांगितल्याचे समजते.
आमदारांच्या नाराजीची सुरुवात राष्ट्रवादीकडे अर्थ आणि गृह मंत्रालय गेल्यापासूनच झाली होती, शिवसेनेच्या अनेक आमदारांना निधी मिळत नव्हता. त्यामुळे शिवसैनिक खूप नाराज होते. निधी मिळत नसल्याची तक्रार अनेक आमदार मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे करायचे. त्यावर मी शरद पवारांशी बोलतो, असं उत्तर मुख्यमंत्री द्यायचे. मात्र त्यापुढे काहीच व्हायचं नाही. संपूर्ण सरकारच शरद पवार चालवणार असतील, तर मग आपण या सरकारमध्ये का आहोत, अशी भावना सेनेच्या आमदारांच्या मनात निर्माण झाली आणि हळूहळू ती अधिक प्रबळ होत गेली. त्याचीच परिणीती एकनाथ शिंदे यांच्या बंडात झाली.